अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग तथा मुख्यमंत्री सचिवालय कक्ष विभागाचे नायब तहसीलदार किरण रामदास देवतरसे (वय 58) यांनी आज रविवारी निंबळक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अवघ्या सहा महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण महसूल प्रशासनात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.
राज्यात आदर्श मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. लखिना पॅटर्नसारख्या नावाजलेल्या प्रशासकीय कार्यपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातील ज्येष्ठ, अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मनमिळावू स्वभाव आणि प्रामाणिक कामासाठी ओळख असलेले देवतरसे हे श्रीगोंदा, शेवगाव तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध महत्त्वाच्या विभागात कार्यरत होते. मागील दोन वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होते.
महसूल प्रशासनातील चर्चेनुसार, मागील काही दिवसांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आणि प्रशासकीय कामाच्या ताणामुळे मानसिक तणावात होते, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत कोणतीही अधिकृत कारणमीमांसा अद्याप समोर आलेली नाही. देवतरसे हे भिंगार येथील साईनगर, आलमगीर परिसरात वास्तव्यास होते. मात्र, त्यांनी आत्महत्या करण्यासाठी थेट निंबळक परिसराची निवड केल्यानेही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. घटनेनंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या गंभीर घटनेनंतर देवतरसे यांनी आत्महत्या का केली? याची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत निपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी महसूल व प्रशासकीय वर्तुळातून होत आहे. जिल्ह्यातील एक अनुभवी अधिकारी अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.
