गेल्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीही काँग्रसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याचं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले रवी राणा?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसकडून विलीनीकरणाचा प्रस्ताव आला असल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना आमदार रवी राणा यांनी म्हटले की, अनेक वर्षांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसने प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस हतबल झाली आहे, या विषयाला डोळ्यासमोर ठेऊन ते सोनिया गांधींशी बोलून लवकरच ते विलिनीकरणाचा निर्णय घेऊ शकतात. ममता बॅनर्जी यांचीही ती परिस्थिती आहे, त्यांच्याही अनेक आमदार-खासदारांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे त्याही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात.
पुढे बोलताना रवी राणा यांनी म्हटले की, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षही लवकरच काँग्रेसच्या कळपामध्ये विलीन होईल. याबाबत संजय राऊत सोनिया गांधी दिल्लीत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच सोनिया गांधी त्या प्रस्तावाला मान्यता देतील.’
रवी राणा पुढे बोलताना म्हणाले की, ‘ठाकरेंची शिवसेना हा सेक्युलर पक्ष आहे, या पक्षासोबत असणारे सर्व नेते आमदार-खासदार काँग्रेसमध्ये सामील होतील. सोनिया गांधींची विचारधारा उद्धव ठाकरेंनी आधीच स्वीकारलेली आहे. त्यामुळेच ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली जाईल. ज्या पद्धतीने ते भाजपचा विरोध करतात, एकत्र राहून आपण काम केलं पाहिजे अशी विचारधारा उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची झाली आहे. त्यामुळे आगामी काळात एकच विरोधी पक्ष राहील असं चित्र आहे.’
