राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार हे कालपर्यंत विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यानंतर ते थेट राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहेत.
अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्यासोबत इतर 9 मंत्र्यांनी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध केला आहे.
अजित पवारांसह इतर 9 जणांची भूमिका चुकीची आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करणं चुकीचं आहे. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी बरंच काही घडायचं बाकी आहे, असं दिसत आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावलं कुणी टाकली असली तर ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोकं बसतील आणि त्यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीचे सहकार्य, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर सगळ्यांशी आम्हाला बोलणं करावी लागेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.
‘अन्यथा मला कारवाई करावी लागेल’
“एक गोष्ट मला सांगता येईल. मी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. काहींवर जबाबदारी टाकली आहे. उदाहरणार्थ जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच प्रफुल्ल पटेल यांचीही नियुक्ती केली आहे. माझं त्यांना स्वच्छ सांगणं आहे, या सगळ्या प्रकारात पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून जी पावलं त्यांनी टाकायला हवी होती ती त्यांनी टाकलेली नाही. त्यामुळे आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा त्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यासाठी उचित अशी कारवाई त्यांनी येवून करावी किंवा मला कारवाई करावी लागेल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर “जे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाईल त्या प्रत्येकाच्या संबंधिचा निकाल घ्यावा लागेल. 9 लोकांचा, त्या प्रत्येकाचा निकाल घ्यावा लागेल”, असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडलं.
