शिवसेना ठाकरे गटानंतर आता मुंबईमध्ये काँग्रेसला देखील खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपावले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे हे पाच माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील तीन माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन हे माजी नगरसेवक पक्ष सोडत असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक
१) पुष्पा कोळी- सायन २) वाजीद कुरेशी- चांदीवली ३) भास्कर शेट्टी- धारावी ४) बब्बू खान- धारावी ५) गंगा कुणाल माने – धारावी
ठाकरे गटालाही बसणार धक्का
दरम्यान दुसरीकडे काँग्रेस पाठोपाठ आजच शिवसेना ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील माजी आमदारांची सून आणि माजी नगरसेविका ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
