गडचिरोली जिल्ह्यात एका गावात पंधरा दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचे गूढ वाढल्यानंतर आता तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय.
एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा-मुलगी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पाचही जणांची विष देऊन हत्या केल्याचं उघड झालं. अहेरी तालुक्यातील महागाव बुद्रुक इथं ही घटना घडली. सुनेसह दोन महिला मुख्य आरोपींना अटक करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, महागाव येथील 22 सप्टेंबर रोजी या कुटुंबातील विजया या 43 वर्षीय महिला डोकेदुखी व थकव्यामुळे आजारी पडल्या. त्यांचे पती शंकर त्यांना कारद्वारे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चंद्रपूरला नंतर नागपूरला गेले.
मात्र तेही आजारी पडले. 26 सप्टेंबर रोजी रात्री शंकर कुंभारे तर 27 सप्टेंबर रोजी सकाळी विजया यांचा मृत्यू झाला. दरम्यान अंत्यविधीसाठी आलेली विवाहित कन्या कोमल माहेरी आली होती. तिचाही 08 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
तर सिरोचा येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असलेला त्यांचा मुलगा रोशन कुंभारे याचाही नागपुरात उपचार सुरू असताना 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. रोशनच्या आई वडिलांच्या अंत्यविधीसाठी महागाव येथे आलेल्या या कुटुंबातील मावशी आनंदा उराडे यांचाही 14 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कसून चौकशी करण्याचे निर्देश दिले त्यात या गुढ मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला. प्रेम विवाह करून घरात आलेल्या सून संघमित्रा कुंभारेचे घरात सासू सासऱ्या सोबत वाद व्हायचे.
दुसरी आरोपी रोजा रामटेके हीचा संपत्तीच्या हिस्स्यातून वाद होता.अखेर या दोघींनी तेलंगणातून विष आणले. मृतकाच्या आणि आजारी व्यक्तींच्या जेवणात खाण्यास दिले.
त्या विषाचा परिणाम हळू हळू होऊन सर्व व्यक्ती एकापाठोपाठ आजारी पडून पाचही जणाचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत या दोघींनी गुन्हा कबूल केला आहे.
